जागतिकीकरणाच्या रेट्यात आर्थिक विकासदर झपाट्याने वाढविण्याच्या मागे जगातील सर्व राष्ट्रांची घोडदौड सुरू आहे. भौतिक विकास व आर्थिक सुबत्ता, विकासाचा दर उत्तरोत्तर वाढवून प्राप्त करता येते. भौतिक सुबत्ता प्राप्त झाली म्हणजे सर्वत्र आनंदीआनंद व सुख समाधान भरभरून वाट्याला येईल, अशी सर्वसामान्यांची कल्पना आहे. याचाच दुसरा अर्थ, भौतिक सोई देणाऱ्या वस्तू व सेवा आणि त्यांची प्राप्ती, हेच जीवनाचे ध्येय ठरले आहे. राहायला स्वतंत्र फ्लॅट, मुलांना कॉन्व्हेंटमधून शिक्षण, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वारेमाप खर्च, कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे मोबाईलची निकड, अप टू डेट माहितीसाठी घराघरात संगणकाची अत्यावश्यकता, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाहिजे ते चॅनेल पाहण्यासाठी एकाच वेळी किमान दोन टीव्ही सेट, फ्रिज, वॉशिंग मशिन अशा आवश्यक वस्तूंची रेलचेल अन् दाटीवाटी दिसते. हे आजच्या शहरी संस्कृतीतील घराचे स्वरूप. कोणत्याही किरकोळ वस्तूसाठी शेजाऱ्यांवर अवलंबून न राहता, सारे कसे स्वतंत्र, स्वत:चेच. इतके सारे खर्चिक घटक सांभाळण्यासाठी कुटुंबातील स्त्रीला त्यामुळे नोकरीची अपरिहार्यता; कधी करिअर म्हणून, कधी प्राप्त केलेल्या उच्च शिक्षणाचा उपयोग म्हणून स्त्रीला- नोकरीनिमित्त बाहेर पडलेल्या स्त्रीला तिचे वेगळे क्षेत्र, स्वतंत्र विश्व, तिचे व्यक्तिमत्त्व जपण्यासाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष होणे अपरिहार्य. त्यातून निर्माण होणारे शारीरिक, मानसिक द्वंद. कुटुंबातील सदस्यांना पूर्ण वेळ देऊ न शकल्यामुळे परस्परांमध्ये निर्माण होणारा दुरावा, विसंवाद, कुटुंबातील तरुण मुलामुलींच्या निर्माण होणाऱ्या जीवनाविषयक समस्या निस्तरताना होणारे खच्चीकरण, असे चित्र सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबात दिसते. कुटुंबातील सदस्य एकाच घरात पेईंग गेस्टप्रमाणे राहतात. स्वतंत्र वृत्तीचे, स्वतंत्र विचारसरणीचे कुटुंबातील सदस्य घर नावाच्या एका छताखाली वावरतात इतकेच खरे. अशा कौटुंबिक वातावरणातील तरुण मुले-मुली मग आपले आनंदाचे क्षण, हॉटेलमध्ये पार्टी देऊन साजरे करतात. आजकाल या पार्ट्यांचे स्वरूपही संशयास्पद बनत आहे.
हातात खळखळ खेळणाऱ्या पैशाने शहरी संस्कृतीला चंगळवादी, भोगवादी बनविले आहे. माणूस मानसिक व अतिरिक्त श्रमांमुळे शारीरिक स्वास्थ्य गमावून बसला आहे. बाहेरून दिसणारा शहरी झगमगाट माणसाला आतून पोखरत चालला आहे. शहरात दिसणारे मोठमोठे मॉल्स, त्यांची संस्कृती, हा शहरी संस्कृतीचा झगमगाट ही सूज आहे; सौष्ठव नाही. कारण या विकासाच्या अवस्थेत माणूस माणूस न राहता बिनचेहऱ्याचा केवळ हाडांमांसाचा गोळा शिल्लक राहिलाय. त्याच्यातील संवेदनशीलता नष्ट झालेल्या आहेत.
No comments:
Post a Comment