Tuesday, February 15, 2011

आत्मविश्‍वास आणि संयम हीच यशाची गुरुकिल्ली - क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (सकाळ वृत्तसेवा - Tuesday, February 15, 2011 AT 12:30 AM (IST))

http://www.esakal.com/esakal/20110215/5202542726386417178.htm


पुणे - क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने सोमवारी "सकाळ'च्या शिवाजीनगर येथील कार्यालयास भेट देऊन संवाद साधला.

पुणे - 'आत्मविश्‍वास आणि संयम ही यशाची गुरुकिल्लीच आहे. मग, क्षेत्र क्रिकेटचे मैदान असो वा कॉर्पोरेट क्षेत्र. या दोन्ही गोष्टी बरोबर राहिल्या तर तुम्ही कारकिर्दीत यशाची "खेळपट्टी' निर्माण करू शकता...'' कसोटी मैदानावरील भारतीय संघाचा तारणहार व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने मांडलेले हे तत्त्वज्ञान.

एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने हा शैलादार फलंदाज सोमवारी पुण्यात आला होता. त्या वेळी त्याने "सकाळ कार्यालया'स भेट दिली, तेव्हा तो बोलत होता. लक्ष्मणची फलंदाजी जितकी प्रगल्भ तितकेच त्याचे विचारही प्रगल्भ असल्याची प्रचिती या वेळी आली. मैदानावर खेळताना कठीण परिस्थितीतही त्याची फलंदाजी इतकी सहज कशी होते, हे त्याच्या विचारावरून दिसून आले. प्रत्येक सामन्याप्रमाणे परिस्थितीनुसार खेळणारा आणि मैदानाबाहेर तेवढ्याच बारकाईने विचार करून बोलणारा लक्ष्मण आज बघायला मिळाला. एखादा छोटासा निर्णयही तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. तसेच खेळामध्येही आहे हे पटवून देताना त्याने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील आपल्या खेळीचे उदाहरण दिले. तो म्हणाला, ""दुसऱ्या कसोटी सामन्यात 4 बाद 60 अशा कठीण परिस्थितीत मी आणि चेतेश्‍वर पुजारा एकत्र आलो होतो. आम्ही फार काही वेगळे केले नाही. केवळ संयम राखून दिवस अखेरपर्यंतचा खेळ खेळून काढला. आमच्यात फार मोठी भागीदारी त्या वेळी झाली नाही; पण त्यामुळे लय सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खच्चीकरण मात्र नक्की झाले. ही छोटी भागीदारी आम्हाला आणि पुढे येणाऱ्या फलंदाजांना प्रेरक ठरली.''

आयुष्य आणि खेळ यांची सांगड घालूनच त्याने आपली मते मांडली. ""कारकिर्दीत प्रत्येक पायरीवर चढताना तुमचा स्वतःवर विश्‍वास असणे महत्त्वाचे असते. जेव्हा स्वतःच्या क्षमतेवर तुमचा विश्‍वास असतो, तेव्हाच तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर मात करू शकता. त्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी सराव करताना खेळावर भर न देता मानसिकता कशी संतुलित राखता येईल, यावर भर देतो.''

क्रिकेटच्या मैदानावर खेळताना असण्याच्या दडपणाचा सामना करताना परिस्थिती समजून घेणे आवश्‍यक असल्याचे सांगून तो म्हणाला, ""खेळपट्टीवर थांबले की धावा होतात आणि तुमचे मनोधैर्य उंचावते, हा क्रिकेटचा मूलभूत मंत्र जरी लक्षात ठेवला, तरी तुमचे दडपण निम्म्याने कमी होते. फलंदाजीला उतरल्यावर संघाची परिस्थिती काय आहे, हे तुम्हाला माहीत असणे आवश्‍यक आहे. त्या वेळी सहकारी फलंदाजाला विश्‍वास देणे आवश्‍यक असते. दोघांमध्ये चांगला समन्वय राखल्यास प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यात तुम्ही यशस्वी होता आणि त्याचा मोठा परिणाम सामन्यावर होतो.''

"आयपीएल' आणि "एमपीएल' या ट्‌वेंटी-20 स्पर्धांमुळे क्रिकेटची व्याप्ती वाढत असल्याचे मत लक्ष्मणने मांडले. तो म्हणाला, ""आयपीएलमुळे केवळ देशातीलच नाही, परदेशातील युवा खेळाडूंतही क्रिकेटचे आकर्षण वाढू लागले आहे. आतापर्यंत पालक क्रिकेटकडे वळण्यास काहीसे अनुत्सुक होते. मात्र, अशा प्रकारच्या वेगळ्या प्रयोगामुळे पालकही मुलाला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. असाच फायदा "एमपीएल'मुळे होत आहे. या स्पर्धेने महाराष्ट्रातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्याचा फायदा खेळाडूंना भविष्यात निश्‍चितच होईल.''

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेविषयी मात्र सावध प्रतिक्रिया देताना लक्ष्मण म्हणाला, ""कुणा एका संघाची संभाव्य विजेता म्हणून गणना करता येणार नाही. कारण, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. अर्थात, अलीकडच्या काळातील भारतीय संघाची कामगिरी लक्षात घेता आपल्याला विजेतेपदाची सर्वोत्तम संधी आहे.''

No comments:

Post a Comment